तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
नवी दिल्ली,दि.३ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – वर्षाच्या अखेरच्या दिवशी दिल्लीच्या कंझावला परिसरात भयंकर अपघात झाला. एका अलिशान कारने दुचाकीवरून जाणाऱ्या अंजली सिंह (२०) या मुलीला धडक देत तब्बल १२ किलोमीटर फरफटत नेल्याचे समोर आले आहे. या विचित्र अपघातात मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे कारमध्ये असलेल्या पाचही तरुणांना कठोर शिक्षा देण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे. ही कार वेगवेगळ्या चार पोलिस ठाण्यांसमोरुन गेली पण कुणालाही पत्ता लागला नाही.
कंझावला परिसरात ३१ डिसेंबरच्या रात्री अंजली दुचाकीवरून जाताना तिला मागून आलेल्या कारने धडक दिली. त्यामुळे ती कारखाली आडकलेली असतानाही गाडीतील तरूणांनी त्याकडे दुर्लक्ष करत पळून जाण्याच्या हेतूने कार वेगाने चालवत पुढे नेली. तब्बल १२ किलोमीटर गेल्यानंतर एका वळणावर त्यांच्या कारचा वेग कमी झाल्याने तरुणी कारखालून बाहेरील बाजूला फेकली गेली. या भीषण अपघातात तिचे डोके रस्त्यावर घसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून त्यामध्ये तरुणी गाडीसोबत फरफटत जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी मुलीचे शवविच्छेदन केले आहे. कुटुबियांनीही शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सखोल चौकशीचे आदेशया अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. तसेच त्यांनी अपघाताबाबतचा अहवालही पोलिसांकडून मागवला आहे.
अंजली आपली आई, दोन भाऊ आणि चार बहिणींसोबत कंझावला येथील अमन विहार परिसरात वास्तव्याला असून ती घरातील एकटीच कमवणारी होती. ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कामाला होती. रात्री काम अटोपून ती आपल्या दुचाकीने घरी जात असतानाच अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.