अकोले,दि.२३ जानेवारी,(प्रतिनिधी) – तालुक्यातील कोतूळ येथे रस्त्याच्या वादातून माजी सरपंचाच्या कुटुंबीयांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस पाटीलदेखील जखमी झाले आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ येथे जुना पैठण रस्ता हा गोडे कुटुंबाच्या शेताशेजारून जात होता. मात्र, काही वर्षांपासून गोडे यांनी या रस्त्यावर शेती करून तो बंद केला. याविरोधात सुरेश देशमुख, बाळासाहेब आरोटे तसेच अन्य लोकांनी तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे रीतसर पुरावे दिल्याने सर्व ठिकाणी गोडे यांच्याविरोधात निकाल गेला. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, तरीही चार दिवसांपूर्वी गोडे कुटुंबाने या रस्त्यावर घराचे काम सुरू केले.
ही तक्रार सुरेश देशमुख तसेच अन्य काही लोकांनी तहसीलदार अकोले पोलिसांकडे केली. याचाच राग मनात धरून काल गोडे कुटुंबीयांनी सुरेश देशमुख यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या देविदास देशमुख, बाळासाहेब आरोटे यांच्यावर गज, खोरे, दगड तसेच धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. तिघेही गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी गेलेले कोतुळ गावचे पोलीस पाटील सतीश देशमुख हेदेखील जखमी झाले आहेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते.