सोबतच पावसाचा तडाखा
मुंबई,दि.२५ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) –
देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट सुरू आहे. तसेच थंडी वाढणार आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातही दिसून येत आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही आज किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतात सक्रीय असणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे हवामानातही मोठे बदल होत आहे. राज्याच्या अनेक भागात यामुळे तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तसेच, महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही राज्यात पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होईल, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेशामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा एकदा सक्रीय झाल्यामुळे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून पुढील ४८ तासासाठी या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रचंड हिमवृष्टी होणार असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीलासुद्धा देशभरात थंडीचा कडाका कायम असेल. अशा परिस्थितीत पावसाचा शिडकावा झाल्यामुळे गारठा वाढू शकतो.
राज्यातील तापमानात सध्या चढ-उतारांचा खेळ सुरू आहे. आज पुन्हा राज्यातील काही भागांत थंडी वाढली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून पुढील काही दिवस तरी नागरिकांची सुटका नाही, अशी शक्यता आहे. अशात राज्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २५ जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.