अहमदनगर,दि.१ मार्च,(प्रतिनिधी) – यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचलाय. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरलाय. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
‘ला-निना’नंतर वाढत चाललेला ‘अल-निनो’चा प्रभाव पाहता 2023 वर्ष सुद्धा उष्ण लहरींचे आणि अधिक तापमान वाढीचे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होणार आहे . राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.